ब्रिटीश काळात समुद्र किनार्याला समांतर असलेल्या वाळूच्या पट्ट्यास दांडा असे म्हटले जाई . नवाबाग ते मूठ या भागाची भौगोलिक रचना या किनारपट्टीस उभी समांतर असल्याने या भागास उभादांडा असे नाव प्रचलित झाले असावे. गावात मासेमारी, माड – बागायत, आंबा, शेती, दुग्धव्यवसाय व भाजीपाला हे व्यवसाय प्रामुख्याने होतात. ग्रामदैवत वेंगुर्लेचा रवळनाथ, मूठ येथील केपादेवी, तर वेंगुर्ले बंदरावरील श्री देव जलबांदेश्वर अशी प्रमुख देवस्थाने आहेत. गावात प्रामुख्याने भंडारी, गाबित, ख्रिश्चन तसेच मागावर्गीय लोकांची वसाहत अधिक आहे. गावाला सुमारे ३ कि.मी. लांबीची किनारपट्टी असल्याने मच्छिमारी हाच प्रमुख व्यवसाय आहे. मच्छिमार लोक ग्रामदैवत रवळनाथ व श्री केपादेवीचा कौल घेतात. श्री जलबांदेश्वर या देवाला जाणकार मानकरी श्रीफळ ठेवून मच्छिमारी करतात. पूर्वी या किनार पट्टीवर तेरा रापण संघ होते पण आज मात्र चार ते पाच रापणी आहेत. मात्र मोठ्या मच्छिमारांच्या यांत्रिक व बिगर यांत्रिक अशा सुमारे पाचशे होड्या आहेत. या गावची सीमा मानसीश्वर देवस्थान ते मोचेमाड घाटी येथील हनुमान मंदिर अशी असून मध्यवर्ती सीमा राखणदार श्री हेळेकर (आडारीरस्ता) याला मानले जाते.
लिंगाची वेळ म्हणून गा संबोधिल्या जाणार्या सागरेश्वर बीचला पर्यटन स्थळ म्हणून येथे पर्यटन महामंडळाने तंबू निवास उभारले आहेत व नावारुपास आले आहेत. तसेच केपादेवी, हेळेकर, उसपकर, विठठ्ल, वाघोबा, हनुमान, वाटोबा, ब्राम्हण, गणपती, घुमटेश्वर बाजुला विठ्ठ्ल मंदिर अशी लहान- मोठी मंदिरे आहेत. उभादांडा शाळा नं.२ जवळील विठ्ठ्ल भक़्त श्री. उसपकर हे आजारी व अशक़्त असल्याने पंढरपूर येथे विठ्ठ्ल दर्शनासाठी जाऊ शकले नव्हते. त्यावेळी उसपकर यांच्या घरात येऊन आषाढ महिन्यात प्रत्यक्ष पंढरपूरच्या विठ्ठ्लाने त्यांना दर्शन दिले, अशी लोकांची श्रध्दा आहे. त्यामुळे या भागातील लोक आषाढी एकादशी दिवशी उसपकर यांच्या विठ्ठ्ल मंदिरात दर्शन घेण्यास भक़्ती भावाने येतात. या उसपकरांनी साठ वर्षापूर्वी समाधी घेतली. त्यांच्यामागे त्यांचे बंधु या स्थानाची व्यवस्था पहातात. उभादांडा-सिध्देश्वर येथील प.पू.आई नरसुले यांची श्री विठ्ठ्ल रखुमाईवर नितांत श्रध्दा होती. तिच्या श्रध्देमुळे असंख्य त्यांनी मार्गदर्शन केले, नामस्मरणाचा मार्ग दाखविला. त्यांनी सन १९८५-८६ मध्ये समाधी घेतली. आज त्यांच्या समाधीजवळ अनेक लोक भक़्तीभावाने जमा होतात आणि त्यांच्या नामस्मरणात दंग होवून जातात. आज आईचे सुपुत्र मोहन नरसुले येथील व्यवस्था पाहतात.
जागतिक किर्तीचे क्रिकेटपटु सुनील गावस्कर, विजय मांजरेकर, रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर व वेंगुर्ले बस स्थानक व आगाराचे जनक मानले जाणारे बी.एन. आडारकर, कृषीरत्न पुरस्कारप्राप्त आंबा सम्राट व माजी आमदार काकासाहेब चमणकर, जेष्ठ कायदेतज्ञ अँड.महाबळेश्वर मोरजे, अहमदनगरचे प्राध्यापक व साहित्यिक, संशोधक डॉ.गंगाधर मोरजे अशी बरीच मान्यवर व्यक्तिमत्वे याच गावची आहेत.